बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- खडी क्रेशरमुळे अनाथ आश्रमातील मुलांचा जीव धोक्यात- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेवराई येथे आई जनहित सेवाभावी संस्थेने बाबा आमटे यांच्या प्रेरणेतुन व लोकसहभागाच्या माध्यमातून पालख्या डोंगराच्या पायथ्याशी सहारा अनाथ आश्रम सुरू केले होते. सध्या अनाथआश्रमाच्या बाजूला प्रशासनाने एका खडी क्रेशरला मंजुरी दिल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने या खडी क्रेशरला दिलेली मंजूरी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी सहारा परिवारातील हीतचिंतकानी केली आहे. यासंबंधी सहारा परिवाराचे संस्थापक संतोष गर्जे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व इतरांना निवेदन दिले आहे.
सन 2005 साली संतोष गर्जे या ऊसतोड मजुराच्या मुलाने समाजातील अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारून गेवराईत छोटेखाली हा सहारा अनाथ आश्रम प्रकल्प उभारला. समाजातील दानशूर व्यक्तिंनी केलेल्या मदतीवर आता हा प्रकल्प स्वतः च्या तीन एकर जागेवरती उभा आहे. गेवराई जवळील पालख्या डोंगराच्या पायथ्याशी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात 100 च्या आसपास अनाथ व 20-30 स्वयंसेवक महिला, मुली वास्तव्यास आहेत. या मुलांचं शिक्षण ते त्यांचा संसार उभा करून देण्यापर्यंत ही संस्था काम करते. या प्रकल्पाची देशातील अति महत्वाच्या व्यक्तींनी दखल घेऊन भेट देखील दिली आहे.
काही दिवसांपूर्वी या प्रकल्पासाठी विजेची मागणी करण्यात आली होती. मात्र सुमारे दोन वर्षे मोठा संघर्ष केल्यावर हा मागील नऊ महिन्यांपूर्वी येथे वीज उपलब्ध झाली. ही वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने दहा लाख रूपयांचं कोटेशन भरून घेतले. या कोटेशनसाठी महावितरण व महसूल प्रशासनातील अनेक अधिकार्यांनी आर्थिक मदत केली होती. या प्रकल्पातून इतर कोठेही वीज जोडणी देण्यासाठी आगोदर संस्थेची ना हरकत लागते. मात्र महावितरणमधील एका अधिकार्याने लालसेपोटी अशी कुठलीही परवानगी न घेता मागील तारखेला या खडी क्रेशरला नियमबाह्य पणे तात्काळ जोडणी उपलब्ध करून दिली. सर्वात आधी ही जोडणी रद्द करण्यात यावी अशी मागणी सहारा परिवारातील हीतचिंतकांनी केली आहे.
खडी क्रेशरला परवानगी दिली कशी ?
खडी क्रेशरला परवानगी देताना महसूलच्या गौण खनिज विभागाने पर्यावरणाचं व जनतेच्या आरोग्याला काही नुकसान होईल का याची तपासणी करण्यासाठी स्पाॅट व्हिजीट करणे गरजेचे होते.
ज्या ठिकाणी खडी क्रेशर उभारले आहे तेथून 200 मीटरवर बालग्रामची इमारत उभी आहे. खडी क्रेशरमुळे लागणार्या दगडांचा ब्लास्ट केल्याने येथील अनाथ मुलांच्या जिवितास धोका उत्पन्न झालेला आहे. वृद्ध मंडळी या परिसरात वाॅक करतात त्यांच्याही जिवितास धोका निर्माण झाला आहे. खडी क्रेशरमुळे धुळीचा मोठा त्रास होत असून बालग्राम परिवाराने लोकसहभागातून तयार केलेल्या रस्त्याची देखील वाट लागणार आहे. पर्यायाने पावसाळ्यात येथील मुलांना शिक्षणासाठी मुकावे लागेल, त्यामुळे या खडी क्रेशरला दिलेली मंजूरी तात्काळ रद्द करावी अशी मागणी सहारा परिवारातील हीतचिंतकांनी केली आहे.


No comments:
Post a Comment