सोलापूर : 'लालपरी' बंदचा विद्यार्थ्यांना फटका एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक बंद असल्याने माळशिरस तालुक्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. कोरोनामुळे शाळा आधीच दीर्घकाळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. अशातच आता शाळा सुरू झाल्यावर एसटी वाहतूक बंद असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी विद्यार्थी व पालकांकडून मागणी होत आहे.तालुक्यातील अकलूज बसस्थानकातून टेंभुर्णी, नातेपुते, इंदापूर, माळीनगर, संगम, माळशिरस बस बसस्थानकातून मगरवाडी, गारवाड, म्हसवड, नातेपुते तर नातेपुते बसस्थानकातून वालचंदनगर, बारामती, निटवेवाडी, फडतरी, कोथाळे या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस धावतात. तालुक्यात साधारण हजारावर पासधारक विद्यार्थी एसटीने शाळेत ये-जा करतात.
हेही वाचा: कर्नाटकात येण्यासाठी आरटीपीसीआरची सक्ती
प्रदीर्घ काळ बंद असलेल्या शाळा चार ऑक्टोबरपासून ऑफलाईन सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी मोठ्या उत्साहात शाळेत येत असून पालक देखील मोठ्या आशेने त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र आहे.खेड्यापाड्यातील,वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना एसटी हे हक्काचे व सोयीस्कर वाहन आहे. मात्र,एसटी वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रिक्षा व अन्य पर्यायाचा विद्यार्थ्यांना त्यासाठी आधार घ्यावा लागत आहे. त्या प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवाय एक-एका रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबून भरले जात असल्याने अपघाताचा धोका संभवत आहे.सामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना तर रिक्षाभाडे परवडत नसल्याने घरीच रहावे लागत आहे.


No comments:
Post a Comment