ना ट्रेसिंग, ना औषधोपचार !
महापालिकेचे कोरोना नियंत्रण ‘राम भरोसे’ .........
नागपूर : प्रत्येक कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २० लोकांची तपासणी करण्याचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात महापालिकेचे पथक निम्म्याही लोकांपर्यंत पोहचत नाहीत आणि ज्यांच्यापर्यंत पोहचतात ते चाचणी करण्यास टाळाटाळ करतात, असे विदारक चित्र कोरोना संसर्गवाढीच्या काळात शहरात दिसून येत आहे.
दुसरीकडे गृहविलगीकरणातील बाधितांपर्यंत औषध पुरवठाही नीट होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
शहरात दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण सापडत आहेत.
प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील २० लोकांची तपासणीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
त्यानुसार दैनंदिन बाधितांची संख्या लक्षात घेतली तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या ही सरासरी पन्नास हजार ते दीड लाखांवर जाते.
प्रत्यक्षात महापालिकेची यंत्रणा रोज २० ते २५ हजार लोकांपर्यंतच पोहचत आहे.
उर्वरित संशयित हे मोकळे फिरत आहेत.
कोरोनाचा उद्रेक लक्षात घेतला तर इतक्या मोठय़ा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही.
सध्या सर्व झोन मिळून दोन सदस्यांचा समावेश असलेल्या १५० पथकांकडे हे काम आहे.
कर्मचारी बाधितांचे कुटुंबीय व इमारत व परिसरातील इतर नागरिकांपर्यंतच पोहचू शकतात.
इतरांशी ते दूरध्वनीवरून संपर्क साधतात व त्यांना चाचणी करण्याची विनंती करतात.
यापैकी ७० टक्के लोक ‘आम्हाला लक्षणे नाही’ असे सांगून चाचणी करण्यास टाळाटाळ करतात, असे महापालिकेच्या पथकातीलच कर्मचारी सांगतात.
दरम्यान, बाधित कर्मचाऱ्यांपर्यंत औषध पोहोचवले जात नाही, त्यांची विचारपूसही केली जात नाही.
गृहविलगीकरणातील बाधितांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस होणे आवश्यक आहे. एकदा विचारल्यावर पुन्हा संपर्क साधला जात नाही, असा आरोप रुग्णांनी केला आहे.


No comments:
Post a Comment