सुरत-अक्कलकोट-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरीडॉर
मुंबई, पुणेतून धावणारी रोजची 50 हजार वाहने होणार कमी
वाहतुकीचा ताण हलका, महत्त्वकांक्षी प्रकल्प
। अक्कलकोट, दि. 18 -
‘भारतामाला’ परियोजनेअंतर्गत सुरत-श्रीक्षेत्र अक्कलकोट ते चेन्नई नवा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. यात सुरत ते सोलापूर व सोलापूर ते महिबूबनगर हा मार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर असणार आहे. या नव्या मार्गामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारी वाहने मुंबई, पुणे शहरातून न जाता थेट नाशिक, अहमदनगर मार्गे सोलापूर, अक्कलकोटला जातील. परिणामी मुंबई व पुण्यातील वाहतुकीचा ताण हलका होवून रोज किमान 50 हजार वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्रालयाने या मार्गास मंजूरी दिली आहे. नाशिक-नगर-सोलापूर या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. नाशिक, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकार्यांची नियुक्ती केलेली आहे. या ठिकाणी भूसंपादनाचे कार्य काही अंशी सुरु झाले आहे.
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आदी राज्यातून दररोज हजारो वाहने दक्षिण भारतात जातात. सुरत-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरीडॉरमुळे दक्षिण भारतात जाणार्या वाहनांना मुंबई, पुणे येथे जावे लागणार नाही.
सदरचा मार्ग हा सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-अक्कलकोट-कलबुर्गी-महिबूबनगर-कर्नुल-तिरुपती ते चेन्नई असा 1 हजार 461 कि.मी.चा मार्ग असेल. यात सुरत ते सोलापूर व सोलापूर ते महिबूबनगर ग्रीनफिल्ड कॉरीडॉर असणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरीडॉर म्हणजे एक्सप्रेस वे, द्रुतगती मार्ग या मार्गावरुन वाहने ताशी 120 कि.मी. वेगाने धावतील असे मार्ग चार किंवा आठ पदरी असतात. रस्त्याच्या बाजुला झाडे देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प हा उपग्रहाव्दारे सर्वे झाला असून सुर-नाशिक-नगर-सोलापूर-हैदराबाद हा राष्ट्रीय मार्ग करण्यासाठी रुपये 6 हजार कोटी अपेक्षित आहेत. महामार्गाचे रेखांकन मार्ग निश्चिती झाली असून भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.
असा होणार फायदा
ग्रीनफिल्ड कॉरीडॉर कमी लोकसंख्या असलेल्या गावातून जातात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करण्याची वेळ येत नाही. परिणामी जमीन हस्तांतरणाला फार वेळ लागत नाही. हा मार्ग बांधण्यासाठी बहुतांश वेळा जमीनी माळरानाच्या अथवा पीक न घेत असलेल्या घेतल्या जातात. त्यामुळे कमी किंमतीत जमीन मिळतात. परिणामी प्रकल्पाचा खर्च कमी होतो. विकसनशिल भागात हा मार्ग जात असल्याने नंतर तो भाग विकसित होण्यास मदत मिळते.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट


No comments:
Post a Comment