गुडघेदुखीची समस्या आता तिशीतच,
रुग्णांच्या प्रमाणात ४० टक्क्यांनी वाढ......
पुणे : बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या बदलत्या सवयींमुळे तिशीपासूनच गुडघेदुखी मागे लागल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गुडघेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्के वाढले असून यामध्ये ३० ते ६० या वयोगटातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
अनेकदा पूर्वी झालेल्या दुखापती किंवा संधिवातामुळे नागरिकांमध्ये गुडघेदुखीची समस्या उद्भवते.
शारीरिक कष्टाची कामे करताना किंवा अति दगदग झाल्यास अशा व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास होतो.
ज्या रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे, ऑस्टिओआर्थरायटीस किंवा ऑस्टिओटॉमीसारखे त्रास आहेत, त्यांना गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय असतो.
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पिसे म्हणाले, व्यस्त जीवनशैली, त्यामुळे बदललेल्या आहार-विहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव यांमुळे गुडघेदुखी ही समस्या तरुणांमध्ये दिसणे हे आता सर्वसाधारण झाले आहे.
गुडघेदुखीची समस्या सुरू झाल्यानंतरही तिच्याकडे दुर्लक्ष केले असता त्यातून बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
गुडघेदुखीची समस्या टाळण्यासाठी वयाच्या चाळीशीनंतर सर्व प्रकारचे व्यायाम तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावेत.
गुडघेदुखीची सुरुवात झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
वयोमान आणि शरीरमानानुसार व्यायामाची निवड करा.
गुडघ्यांवर अतिरिक्त भार येणार नाही याची काळजी घ्या.
वजन वाढू न देणे तसेच जड वजन न उचलणे ही खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे.
गुडघे प्रत्यारोपणानंतरही सायकल चालवणे, धावणे, पोहणे, नृत्य करणे या बाबी शक्य आहेत,
मात्र डॉक्टरांशी चर्चेनंतरच त्या
केल्या जाव्यात, असेही डॉ. पिसे यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment